मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचे संकट गडद होत आहे. दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर आता १५ दिवस संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवसभर बैठका घेतल्या. बैठकीत लॉकडाऊन कशा प्रकारे लावायचा यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाधिक लोकांना शिवभोजन थाळी मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. एवढेच नाही तर रेशन दुकानांतून तांदूळ, गव्हासोबतच डाळी, साखर, तेलाचाही पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.
नोव्हेंबरपासून दारिद्र्यरेषेवरील व्यक्तींना ८ रुपये किलो गहू आणि १२ रुपये किलो दरावर तांदूळ देण्याची बंद झालेली योजना पुन्हा सुरू करण्याचाही विचार सुरु आहे. त्याशिवाय नोंदणीकृत १० लाख बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात तत्काळ प्रत्येकी पाच हजार रुपये टाकण्याचाही विचार सुरू आहे. लॉकडाऊन काळात मदतीसाठी वित्त विभागाने तयार केलेले पॅकेज अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्याचे समजते. दरम्यान या कालावधीत विमान, रेल्वे, बससह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लॉकडाउनच्या काळात गोरगरिबांना फटका बसणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे. त्यासाठी पॅकेज दिले जाणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीमध्ये याचा विचार करून चालणार नाही. लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्या गोरगरिबांना मदत देणे अत्यावश्यक आहे आणि ती दिली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.