मुंबई : बहुजननामा ऑनलाईन-
काल गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमीत्त पंकज मुंडे यांनी गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषणात ओबीसी नाराज आहे असं काही वक्तव्य नव्हतं, त्यांच्या मनात दु:खं आहे ते मांडले. ओबीसी समाज भाजपावर नाराज नाही. गेल्या अनेक वर्षापासून नेते पक्षासाठी काम करतायेत. पक्षाने सगळ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पदं दिली आहेत. नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही असा टोला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, कोअर कमिटीत जे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राला पुढे कसं नेता येईल? सर्व समाजाला न्याय मिळेल असं काम केलं पाहिजे. महाराष्ट्राला, भाजपाला राज्यात पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व कामी आलं. त्यांच्या कर्तृत्वाने ते पुढे आले आहेत. महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात एकही समाज असा नाही ज्यांना नेतृत्व मिळालं नाही. माणसं समाजाचं नेतृत्व करतात पण जातीमुळे माणसं मोठी होत नाही तर कर्तृत्वाने मोठी होतात. सरकार आलं नसल्याने जातीचं राजकारण केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला.