मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला आहे. आज मंत्रालयात दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या निष्ठा तपासण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात पोलीस दलात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना पोलीस दलामध्ये आरएसएससोबत निष्ठा असलेले अनेक अधिकारी आहेत, याबाबत वळसे पाटील यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना ते म्हणाले, याबाबत सर्व माहिती घेण्यात येईल. कुणाच्या काय निष्ठा आहेत याची माहिती घेऊ. त्यानंतर जसं जसं आवश्यक असेल तसा निर्णय घेऊ, असे वळसे पाटील म्हणाले.
IPS लॉबीवर अंकुश ठेवणार ?
IPS लॉबी सरकारविरोधात काम करत आहे. ते विरोधकांना माहिती देत आहेत, यावर काय करणार ? असा प्रश्न वळसे पाटील यांना विचारण्यात आला. यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले, फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तसेच गृहखात्याचा पदभार त्यांच्याकडे पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांना माहिती मिळते. त्यातून कसा मार्ग काढायचा आणि कामात सुधारणा कशी होणार या संदर्भात विचार केला जाणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले.
प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही
पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. स्वच्छ प्रशासन देण्यावर भर असेल. तसेच प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही. बदल्यांच्या संदर्भात प्रत्येक विभागाची जी पद्धत ठरली आहे, वेगवेगळ्या स्तरावर जे अधिकारी दिले आहेत. त्यानुसार काम करु असे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह प्रकरणी जो निर्णय दिला आहे त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी महत्त्वाची माहिती वळसे पाटील यांनी दिली. तसेच कोर्टाने जो आदेश दिला आहे त्याला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.
पोलीस भरती गतीमान करणार
महिला आणि सामान्य नागरिकांना गृहविभागाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणार आहेत. शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणार आहे. तसेच पोलिसांना घरं देणं यावर लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.