मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा तक्रारी येत होत्या. वाहन उपलब्ध नसल्याने कित्येक तास रुग्णांना ताटकळत राहावे लागत होते. आता यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने सगळ्या खासगी रुग्णवाहिका ताब्यात घ्यायचा निर्णय घेतला आहे. आता रुग्णवाहिकांचा दर सरकार ठरवणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आदेश काढण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने खासगी वाहने अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहित केलेल्या अँब्युलन्स जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरीता जिल्ह्यांमध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतानाच गरज भासल्यास खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्णवाहक वाहन म्हणून वापर करण्याचा निर्णय झाला आहे. खासगी रुग्णवाहिकांसाठी रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने अधीग्रहीत करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.