मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपविली होती. कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा प्रचार केला. उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातही अमोल कोल्हेंनी सभा घेऊन राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन केलं. नुकताच त्यांच्या शिरुर मतदारसंघातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. मात्र, निवडणूक निकालानंतर अमोल कोल्हे गायब झाल्याचं दिसून आले. निवडणुकीच्या निकालानंतर अमोल कोल्हे विजयी उमेदवारांच्या सेलिब्रेशनमध्ये कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पत्रकारांनीही याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वतः अमोल कोल्हेंनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
‘अमोल कोल्हे यांनी सांगितले कि, ‘आपल्याला एक कळतं की, आपला रोल संपला की आपण व्यासपीठ सोडायचं. स्टेजवर कधी थांबायचं आणि विंगेत कधी जायचं हे ज्याला कळतं त्यालाच रोल निभावता येतो, जे अत्यंत महत्त्वाचं आहे”, पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडली, त्यानंतर आपलं काम संपलं, असं सांगितलं. कोल्हे यांनी महाशिवआघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबतही आपले मत व्यक्त केलं. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे.
महाशिवआघाडीबाबाबत उत्तर देताना महाशिवआघाडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर याबाबत चर्चा करू असं मत कोल्हे यांनी व्यक्त केलं. तसेच महाशिवआघाडीचे सरकार येणार की दुसरं कोणाचं सरकार येणार याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं उत्तर देऊ शकतील. तरी राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी अशी माझी इच्छा आहे, असं मत कोल्हे यांनी व्यक्त केलं. तसेच शरद पवार जी भूमिका घेतील, ती राज्याच्या भल्यासाठी घेतील, असा विश्वास महाराष्ट्राला आहे आणि आपण देखील हा विश्वास साहेबांसाठी कायम ठेऊया. माझं जनसंपर्क कार्यालय तुमचं आहे, तुमच्यासाठीच आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी आपल्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
Visit : bahujannama.com