मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा थेट सुप्रीम कोर्टात पोहोचल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोर्टाने आज अंतिम निर्णय देत उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश फडणवीस सरकारला दिले आहेत. मात्र उद्या होत असलेल्या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कोण होणार यावरून प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना हंगामी अध्यक्ष करायला हवे, अशी चर्चा सुरु आहे. तरी राज्यपाल हंगामी अध्यक्षपदी कोणाला जबाबदारी देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, २००९ साली गणपतराव देशमुख हे विधानसभेत सगळ्यात जेष्ठ सदस्य असल्याने त्यावेळच्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच २०१४ साली सुद्धा देशमुख हे सर्वात जास्त वेळा निवडून आलेले जेष्ठ सदस्य होते. तसेच दुसरे सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे नवं पुढे येत होते ,मात्र या दोघांनीही त्यावेळी त्यांनी हंगामी अध्यक्ष होण्यास नकार दिला. त्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सदस्य जीवा पांडू गावित यांना हंगामी अध्यक्ष करण्यात आले.
सध्या विधिमंडळ सचिवालयाने सर्वात जेष्ठ सदस्यांची नावे पाठवणे अपेक्षित आहे. दरम्यान विधिमंडळाने अठरा नावे कळवून संभ्रम निर्माण केला आहे. दरम्यान, राज्यपालांनी सगळ्यात जेष्ठ सदस्य म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड करायला हवी, परंतु बबनराव पाचपुते किंवा कालिदास कोळंबकर या दोघांपैकी एकाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Visit : bahujannama.com