मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिल्लीतील शाळांची देशभरात चर्चा असून आता महाराष्ट्रातील शाळांची गुणवत्ता, दर्जा वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता दिल्ली पॅटर्न राबवणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सोमवारी मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली.
दिल्लीतल्या विकसित सरकारी शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा विकास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत घेतला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. pic.twitter.com/lo0YPrfewJ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 13, 2020
या बैठकीमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीच्या शासकीय शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळांचा विकास करण्यात येणार आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच दिल्लीतील सध्याचे शैक्षणिक मॉडेल देशात चांगले असून महाराष्ट्रात शिक्षण ही कायम सरकारची प्राथमिकता होती. वेगवेगळ्या उत्पन्न, समाज घटकापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
दिल्ली मॉडेलची अंमलबजावणी मुंबईतील काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच दिल्लीतील शाळांचा अभ्यास कारण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून राज्यातील शाळांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागातर्फे २० टक्के आणि रस्त्यांसाठी ३० टक्के निधी देण्याचे आदेशही अजित पवार यांनी दिले.
Visit : bahujannama.com