मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात शिवसेना , काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत सरकार स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. दिल्लीतून महाशिवआघाडीला हिरवा कंदील मिळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून जोरदार बैठक सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासंदर्भात विचारले असता उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो मान्य असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तयारी केली आहे का, असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंना यांनी माध्यमांसमोर हात जोडले, तसेच या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणले. तर दुसरीकडे सुनील प्रभू, प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंनी मुंबईत राहण्याचेच आदेश दिल्याचं सांगितले आहे. जयपूरला वगैरे कुठेही जाणार नसून शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतच राहणार असल्याचं सुनील प्रभूंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, महाशिवआघाडीच्या सरकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनीच करावं, असं सर्व कार्यकर्त्यांचं तसेच तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाला तिन्ही पक्षांनी सहमती दिलेली आहे, असा खुलासाही शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी केला आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात दोन फॉर्म्युले तयार करण्यात आले असून ते शिवसेनेसमोर ठेवण्यात येणार आहेत. एका फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या वाट्याला प्रत्येकी उपमुख्यमंत्रिपदासह अनुक्रमे १५ व १३ मंत्रिपदे येतील. तर दुसऱ्या प्रस्तावात शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी १४ मंत्री असणार आहेत. या फॉर्मुल्यात तिन्ही पक्षांना समान मंत्रिपदाची मागणी शिवसेनेने मान्य न केल्यास महत्त्वाची खाती मिळावीत, असा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा आग्रह आहे. राष्ट्रवादीला गृह आणि अर्थ, तर काँग्रेसला महसूल व ग्रामीण विकास ही खाती हवी आहेत. नगरविकास खाते शिवसेनेला देण्यास दोन्ही पक्षांची तयारी आहे. त्त्यामुळे शिवसेना कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Visit : bahujannama.com