मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- विधानसभेचा निकाल लागून २१ दिवस उलटले तरी सत्ता स्थापन झाली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. परंतु काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याची चिन्हं दिसत आहे. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेत्यांची बैठक झाली असून या बैठकीत अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी १६ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच म्हणजेच १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
राज्यात महाशिवआघाडी एकत्रित येत सत्तास्थापनेची वाटचाल करत आहे. महायुतीबरोबर सत्ता स्थापन करते वेळी मुख्यमंत्रिपदावरुन अडून असलेली शिवसेना युतीबरोबर न जाता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाय्याने राज्यात मुख्यमंत्री बनविणार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हे या महाशिवआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात ठरलं असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी तीन नावं चर्चेत आहेत.
दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गुरुवारी रात्री बैठक झाली. या झालेल्या समन्वय बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी बैठकीला हजेरी लावली होती. बैठकीनंतर या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा निवडणुका नकोत. त्याचा भार जनतेवर नको म्हणून आम्ही एकत्र येत असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. लवकरच हा मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असून येत्या काही दिवसात राज्याला नवीन सरकार आणि मुख्यमंत्री पाहायला मिळणार असल्याचं म्हंटल जात आहे.
Visit : bahujannama.com