मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या ५९ उमेदवारांची आज मुंबईत बैठक पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उमेदवारांना मार्गदर्शन केले. या बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. परंतु निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी या उमेदवारांची मानसिकता सकारात्मक आहे, त्यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांनी मिळून एकूण १६४ जागा लढवल्या. त्यापैकी १०५ जागांवर भाजपला विजय मिळाला. तर इतर ५९ जागांवर हार मानावी लागली. या पराभूत उमेदवारांची आज बैठक झाली. बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान सर्व पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक दिसून आली आहे.
दरम्यान ”बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पराभूत आमदारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी राज्यात भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास पराभूत उमेदवारांनी दिला आहे. तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांना सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारमध्ये तसेच पक्षसंघटनेत सामावून घेण्यात असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com