मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकताच शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केला होता त्यात 10 रुपयात सकस जेवण देणार असल्याचं म्हटलं होत. यावरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. वचननामा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे बजेट कुठून आणणार? 10 रुपयात थाळी देणार त्यातील नुकसाना कोण भरून देणार ? असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना दिसत आहे.
नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे वचननामा पूर्ण कुठून करणार, याचं बजेट कुठून आणणार ? 10 रुपयात थाळी देणार त्यातील नुकसान कोण भरून देणार ? उद्धव ठाकरे सातबारा कोरा करणार असं म्हणतात. त्यांना सातबारा तरी माहिती आहे का ?” असा सवाल करत राणेंनी जहरी टीका केली.
पुढे बोलताना राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे तीनही उमेदवार निवडून येणार हे नक्की. कणकवलीतून शिवसेनेने उमेदवार उभा केलाय त्याची दखल घेत नाही. काम करणारे आमदार म्हणून नितेश राणे प्रसिद्ध आहेत. कुडाळच्या आमदाराचं नाव तरी आहे का ? जनतेला विकास अन् नोकऱ्या पाहिजेत. त्यामुळेच सिंधुदुर्गमधील जनता भाजपच्या पाठिशी ठाम आहे.” असंही ते म्हणाले.
शिवसेना आणि त्यांच्यातील कटुतेवर बोलताना राणे म्हणाले, “दोन्ही बाजूने कटुता संपवण्याचा विचार होत असेल तर आमच्यातील कटुता नक्की संपेल. आमची बाजू मजबूत आहे. आमचा विजय निश्चित आहे.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात युतीच्या माध्यमातून लढणारे भाजप आणि शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र एकमेकांविरोधात दंड थोपटताना दिसत आहेत. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेनेचे सतीश सावंत हे त्यांच्याविरोधात मैदानात आहेत.
Visit : bahujannama.com