मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, याप्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पूजा चव्हाण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. काही जणांना ताब्यात घेतले आहे अशी ऐकीव माहिती आहे. आम्ही पोलिसांच्या तपासात मध्यस्थी करत नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांना अरुण राठोडला ताब्यात घेतले आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले, पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले आहे. आम्ही यात कोणतीही मध्यस्थी करत नाही. चौकशी सुरु असून त्यातून नेमकं सत्य समोर येईल. काहींना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. मी काही पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला तर त्यामध्ये राजकीय हस्तेक्षेप होतो, असे बोलले जाते. त्यापेक्षा निर्भीडपणे चौकशी करा असे आपण पोलिसांना सांगितले असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच वनमंत्री संजय राठोड गायब नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आपण संजय राठोड यांच्याशी फोनवर बोललो असून जिल्ह्यातील कोरोची स्थितीबाबत चर्चा केल्याचे सांगितले.
या तिन जिल्ह्यात लॉकडाऊनचे संकेत
अजित पवार यांनी राज्यात वाढत असलेल्या कोरोना संदर्भात बोलताना सांगितले की, सरकारकडून कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय असून तिथे लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जात असल्याचे सांगून या तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.