मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील असे सांगत लॉकडाऊन करायचा की नाही? याबाबत विचार सुरू असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक होत असून यात कोरोना रुग्णवाढीवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, लोक मास्क वापरत नाहीत. कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करत नाही. त्यामुळे आता कठोर निर्णय घ्यावेच लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात जानेवारीच्या अखेरीस कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती. पण फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढू नये म्हणून जी खबरदारी आणि जे निर्णय घेण्याची गरज वाटेल ते घेतले जातील, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री पवार यांनी लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. मुंबईपेक्षा अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे फक्त शहरांमध्ये की ग्रामीण भागातही लॉकडाऊन लावायचा याबाबत विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.