मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे औरंगाबाद, नागपूर, अमरावती शहरात अंशतः लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का अशी चर्चा सुरू आहे. पण राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, कडक निर्बंध लावले जातील, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
आरोग्यमंत्री टोपे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल माहिती दिली. कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजनावर चर्चा सुरू आहे, कोविड संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार म्हणून आम्ही त्या सूचनांचे पालन करत असल्याचे टोपे म्हणाले. कॉन्टॅक्ट ट्रेंस करणे हे राज्य सरकार पुढे आव्हान आहे. कुठेही बेड कमी नाहीत. राज्यात 85 टक्के ए सिमटोमॅटिक रुग्ण आहेत. तसेच रोज 3 लाख लसीकरणाचे लक्ष आहे. लसीकरणासाठी 100 बेडच्या रुग्णालयाची अट शिथिल करून 50 किंवा 25 करावी अशी मागणी आम्ही केंद्राकडे केल्याचेही टोेपे यांनी सांगितले.