बहुजननामा ऑनलाइन टीम – आज सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजता बहुमत चाचणी होईल. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी आता फक्त ३० तास उरले आहे. उद्या बहुमत चाचणी असल्यामुळे ‘देवेंद्र सरकार-२’ संकटात सापडले आहे. सर्व परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे.
बहुमत चाचणीमध्ये विश्वासदर्शक ठरावावर खुले मतदान घेऊन त्याचे थेट प्रक्षेपण करण्याच्या स्पष्ट सुचना न्यायालयाने दिल्या आहे. विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचा नेता निवडून आला, तरच विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे. अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा, अशी भूमिका भाजपाकडून घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नव्या सरकारला तातडीने विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. यावर न्यायलयाने उद्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपाला आमदारांची फाटाफूट करण्यासाठी फार वेळ मिळणार नाही. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल रात्री ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांनी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेत शक्तिप्रदर्शन केले. या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्रदेखील महाविकासआघाडीकडून राज्यपालांना देण्यात आले आहे. महाविकासआघाडीने १६२ आमदारांचा दावा केल्यामुळे भाजपा बहुमत कसे सिद्ध करणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Visit : bahujannama.com