मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटला असून फडणवीस सरकारनं राजीनामा दिल्यानं राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्या (२८ नोव्हेंबर) दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून या सोहळ्यासाठी प्रशासनासोबतच आघाडीच्या तिन्ही पक्ष जय्यत तयारी करताना दिसून येत आहे.
दरम्यान, या शपथविधी सोहळ्यांना अनेक दिग्गजांसोबत राज्यातील ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी सांगितले कि, हे सरकार माझं सरकार असेल अन् सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणार. त्यामुळे शिवसेनेकडून शेतकऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात येणार असून सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याचसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.
ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने राज ठाकरे यांनाही उद्धव ठाकरेंनी निमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे सहकुटुंब या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. यासाठी सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. रॅपिड एक्शन फोर्स, बॉम्बशोधक नाशक पथक, श्वान पथक आदिसह ४ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
उद्याच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कवर हजेरी लावणार आहे. त्यामुळे अतिशय भव्यदिव्य आणि ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा पार पडेल असं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.