मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – देशाच्या जडणघडणीत आजवर महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या तीन राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या तीनही राज्यांकडे आजही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केलं आहे. सरहद संस्थेने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र-बंगाल मैत्री पर्व’चे औपचारिक उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात चित्रपट निर्माते निलेश नवलाका, डॉ. अमोल देवळेकर, संयोजक युवराज शाह, विकास सोनताटे आदी उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी निमित्त 1 ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या पर्वांतर्गत 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र आणि बंगालमध्ये साहित्य, कला, संस्कृती आणि समाजकारणाच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, लाल-बाल-पाल या तिघांचे भारताच्या जडणघडणीमध्ये खूप मोठे योगदान आहे. काँग्रेसची स्थापना होण्याच्या वेळी देशात प्लेगची साथ आली होती. त्यामुळे पुण्याला होणारे अधिवेशन मुंबईला घ्याव लागलं होतं. तशीच परिस्थिती आजही आहे. पुण्याला होऊ घातलेला हा कार्यक्रम आज मुंबईत होत आहे. खरंतर माणसांना माणसांपासून दूर ठेवणारा सध्याचा सोशल डिस्टन्सिंगचा काळ आहे. या काळात दोन राज्यांना जवळ आणण्याच्या उपक्रमाची सुरुवात होतेय, हे महत्त्वाचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले, लाल-बाल-पाल या तिघांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नवा आयाम दिला. त्यामागे संत नामदेवांनी सुरु केलेल्या वैचारिक देवाण-घेवाणीची परंपरा आहे. ही परंपरा पुढेही सुरु राहीली. रवींद्रनाथांचे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी होते. त्यांनी संत नामदेवांचे अभंग बंगाली भाषेत नेले. गीतारहस्यही बंगालीत नेले. सुभाषबाबूंचे तर प्रेरणास्थान शिवाजी महाराज होते. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांवरही रवींद्रनाथांचा खूप प्रभाव होता. या देवाणघेवाणीच्या ऐतिहासिक पर्वाला या निमित्ताने उजाळा मिळाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.