मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवार साहेब असा सवाल उपस्थित करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वाभिमानाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सामनाच्या संपादकीयमधून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे असे शरद पवार म्हणाले होते.
काय म्हटलंय सामनाच्या संपादकीयमध्ये ?
कोणी पक्ष सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवार साहेब ? स्वत: पवार साहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर सोनियांबरोबर वाद केला. काँग्रेस पक्षात बंड केलं. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड दोन दशकांपासून त्यांचे राजकीय गुप्तगू सुरू आहे.
शिवसेना किंवा भाजपातील काही मंडळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत सामील करून घेतली तेव्हा या मंडळींनी स्वाभिमानाचे कोणते शिखर जिंकले होते. त्यांनी तेव्हाही स्वाभिमान वगैरे शब्दाची ऐशी की तैशीच केली होती. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचे टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही.
पवार साहेबांचे असे सांगणे आहे की, “माझ्या राजकीय कारकीर्दीच्या 52 वर्षांत 27 वर्षे सत्तेबाहेर होतो. सत्तेबाहेर राहून अधिक जोमाने काम केले. आता पक्षांतर करणारे विकासासाठी जात आहेत असे सांगतात तेव्हा गंमत वाटते.” पवारांना गंमत वाटणे हीच मोठी गंमत आहे. पवार साहेब तुम्ही ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनूच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता ? वळणाचे पाणी वळणाला गेले.