मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- विधानसभा निवडणूक जवळ येत असून प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत पक्ष स्वबळाची वाट धरतील की महायुतीविरुद्ध महाआघाडी सामना रंगेल अशी चर्चा सुरू आहे. भाजप-शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. अशी माहिती समोर आली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अटींवर युती करावी याबाबत सूचना दिल्या आहेत.
मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सूचाना दिल्या आहेत की, ‘शिवसेनेसोबत युती करा, तडजोड नाही.’ यामुळे आता शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण मोदींच्या सूचनेनंतर जागावाटपादरम्यान भाजप आक्रमक भूमिका घेत जास्त जागा मागण्याची शक्यता आहे. सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी सुरु आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे समजत आहे.
लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाला विराट विजय मिळाला आहे, त्यामुळे आगामी विधानसभेतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आगामी निवडणुकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जाण्याची शक्यता आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुन्हा एकदा या पदावर दावा सांगत आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरूनच आगामी काळात संघर्ष होण्याची शक्यता आहे असंही बोललं जात आहे.