तासगाव बहुजननामा ऑनलाईन – कवठे महांकाळमधून आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत. अशी घोषणा करत तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीतून निधी मिळवू, असे वक्तव्य सीमा आठवले यांनी तासगावातील आयोजित महिला मेळाव्यात केले. सीमा आठवले या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सततचा दुष्काळ, दुष्काळी भागातील शेकऱ्यांच्या समस्या, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण लक्ष घालणार आहोत, याशिवाय महिलांच्या विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.अशी माहिती आठवले यांनी याप्रसंगी दिली.
यातच तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा सर्वात मजबूत मतदारसंघ आहे. ते २०१४ च्या निवडणुकीतही विजयी झाले होते. मात्र, त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने नंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी विजय मिळविला. येत्या विधानसभा निवडणूकांसाठी राष्ट्रवादीकडून सुमन पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
दरम्यान, पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ज्योती पाटील विरूद्ध सुमन पाटील अशी मुख्य लढतीची शक्यता असताना अचानक सीमा आठवले यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. या परिस्थितीत सुमन पाटील, ज्योती पाटील आणि आता सीमा आठवले यांची तिंरगी निवडणूकीची लढत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.