बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीही आपला विजय पक्का असावा यासाठी शिवसेना आणि भाजपचा चांगलाच मास्टर प्लॅन चालूं आहे. या प्लॅननुसार राष्ट्रवादीचे अनेक नेते सध्या भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीसाठी हे चिंतेचे विषय बनले आहे. ‘तोडा फोडा आणि राज्य करा ‘ या धोरणानुसार सध्या विरोधकांना कमकुवत करण्याचे जोरदार प्रयत्न शिवसेना- भाजपकडून होत असल्याचे म्हणले जात आहे. या सगळ्या गोष्टी सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी देखील उपस्थित होते.
जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाणून राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. पण अजूनही या भेटीमधील कारण हे समोर आलेले नाही. छोटे पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवावी का ? याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तर अलीकडच्या काळात राष्ट्रवादीतून नेत्यांची पक्षांतर होत असल्याने ही भेट नव्या समीकरणाची नांदी असावी, अशी चर्चाही सध्या जोरात सुरु आहे.
तर दुसरीकडे विरोधक येत्या ९ ऑगस्ट रोजी ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार असल्याने या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान ८ जुलै रोजी राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन ईव्हीएमसंदर्भात मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा, अशी मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली होती.
जयंत पाटील यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट मुंबईत सिल्व्हर ओक येथे झाली. राज ठाकरे भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील तसेच मुंबई अध्यक्ष या विषयावर शरद पवारांसोबत विचारविनिमय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.