बहुजननामा ऑनलाईन – पत्रकाराला मारहाण प्रकरणी चर्चेत आलेले आमदार जयंत पाटील यांनी सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सांगोल्यात आयोजित मेळाव्यात त्यांनी “वयाच्या १४ व्या वर्षी राजकारणात आलो. वय वाढवून वयाच्या १७ व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो,” असे खळबळजनक वक्तव्य पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राजकारणी नेते सत्तेच्या हव्यासापायी कशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणेचा वापर करुन घेतात याचे उदाहरण समोर आले आहे.
खरेतर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार तर २१ वर्ष पुर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळतो. पण भावनेच्या भरात त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षीच पंचायत समितीचे सदस्य झाल्याचे कबूल करुन स्वतःच्या अडचणी वाढवून घेतल्या आहेत. तर त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात शेकापने पाठिंबा देऊनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवाराला निसटता विजय मिळाला. तर मावळमध्ये राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला यश आले नाही. त्यामुळे “शेकापची अडीच लाख मतं गेली कुठे,” असा प्रश्न विचारताच संतापलेल्या पाटील यांनी “काय वाट्टेल त्या बातम्या छापता काय” असे म्हणत पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केली. या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला होता. हा सर्व प्रकार मतमोजणी केंद्रात पोलिसांसमोरच घडला.