नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत काल अनंत चतुदर्शी मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्राने गणपती बाप्पाला निरोप दिला. कोणी समुद्राच्या कडेला तर कोणी नदीमध्ये आपल्या बाप्पाचे विसर्जन केले. मात्र संबंध राज्यामध्ये काल विसर्जनादरम्यान १७ लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार काल कोकणात पाच, विदर्भात सहा, भंडाऱ्यात एक, वर्ध्यात एक, श्रीरामपूरमध्ये एक, कराडमध्ये एक आणि नांदेडमध्ये एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त विसर्जनादरम्यान सहा लोक बेपत्ता झाल्याचे समजते मात्र त्यांचाही बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
विसरर्जनानिमित्त काल पुण्यासह मुंबईसारख्या भागातही मोठी गर्दी पहायला मिळाली. मुंबईमध्ये गिरगांव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा अशा अनेक चौपाट्यांवर मिरवणुकीची गर्दी पहायला मिळाली. विसर्जनानिमित्त पूर्ण शहरात पन्नास हजार पोलिसांचा बंदोबस्त होता तर पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. दिल्लीतही गणपती विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ शोध पथक पाठवून तपास कार्याला सुरुवात केली होती.