कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात राजधानी दिल्ली मध्ये शिवजयंती मोठ्याप्रमाणात साजरी केली जाते. गेल्यावर्षी पहिल्यांदाच हजारो लोकांना एकत्र करत ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली. ज्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी झाले होते. खासदार संभाजीराजे यांच्या कार्यामुळे संपूर्ण दिल्लीकरानां शिवजयंती सोहळा जवळून पाहत आला.
शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता किंवा मराठी लोकांपुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण देशाचा उत्सव झाला पाहिजे. शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचं स्वराज्य हे जनतेचं सुराज्य होतं. खऱ्या अर्थाने संपूर्ण देशवासीयांच्या मनावर आजही शिवरायांचं अधिराज्य कायम आहे.
दिल्लीतील शिवजयंती उत्सवाला राष्ट्रोत्सव म्हणून साजरी करण्यासाठी जवळपास ३०० वारकरी, पोवाडे, ध्वज पथक, ढोल ताशा पथक, हलगी पथक, धनगरी ढोल, लेझीम पथक, वासुदेव, गोंधळी, अश्या अनेक पारंपरिक वाद्यांनी दिल्ली बहरून जाणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन युद्धकला , मर्दानी खेळ (स्त्रिया व पुरुष) यांचेही प्रदर्शन होईल.
महाराष्ट्रातून जवळपास १५०० कलाकार येणार आहेत. त्यांना दिल्लीमध्ये येण्यासाठी एका विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. या विशेष रेल्वे गाडीला ‘महाराणी ताराराणी एक्सप्रेस’ असे नाव दिले आहे. हि विशेष रेल्वे सर्वांसाठी मोफत आहे. सदरची रेल्वे शनिवार दिनांक १६/०२/२०१९ रोजी छत्रपती शाहू टर्मिनस (कोल्हापूर रेल्वे स्थानक) येथून दुपारी २.०० वाजता निघणार आहे व दिनांक १९/०२/२०१९ रोजी सांगता संमारंभानंतर रात्री ९.०० वाजता दिल्लीहून कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. यातून येणा-या सर्व शिवभक्तांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली. तरी येणा-या शिवभक्तांनी श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या न्यू पॅलेस, कोल्हापूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन केले आहे.