भोपाळ : वृत्तसंस्था- वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा विजय हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यासाठी ही ‘आर’ या ‘पार’ची लढाई आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासाठी खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे या लढाईत उतरले असून शेवटच्या टप्प्यात ते भोपाळवर आपले सर्व लक्ष केंद्रित करणार आहे.
भोपाळमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह आणि दिग्विजय सिंह यांच्या लढतीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. प्रज्ञासिंह यांना जिंकविण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्यासाठी एक मोठी योजना आखली आहे. या योजनेनुसार दिग्विजय सिंह यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येत आहे. जेथे जेथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्या त्या ठिकाणांवर अंतिम टप्प्यातील प्रचारामध्ये भाजप आपले लक्ष्य केंद्रीत करणार आहे.
त्यात दिग्विजय सिंह कोठे सापडतात का याकडे बारीक नजर ठेवून त्यांच्याविरुद्ध निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्याची संधी शोधली जात आहे. त्यांना शेवटच्या टप्प्यात निवडणुक आयोगाच्या तक्रारीला उत्तर देण्यात गुंतविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शेवटच्या टप्प्यात अमित शहा हे भोपाळमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. ते स्वत: या मतदारसंघातील प्रचारावर लक्ष ठेवून आहेत.