मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे. तसेच सरकारला टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचं विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशत: लॉकडाऊन जाहीर केलं आहे. या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठींबा आहे. राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो. तसेच राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी पाहिजे तिथे सहकार्य करावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात सध्या रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरही सरकारने लक्ष द्यावे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांचे खूप हाल होणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांसाठी सरकारने काहीतरी तरतूद करावी. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे आवश्यक आहे. यासाठीही राज्य सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत करण्याचेही त्यांनी आवाहन केले. मधल्या काळात राज्य सरकार गाफिल राहिल्याने ही वेळ आली असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.