मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी मंत्रिमंडळ, टास्क फोर्स आणि सचिवांची बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली आहे. या चर्चेतून राज्यातील कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आल्याने राज्यात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार असून त्याची नियमावली आजच जाहीर होईल, असे संकेत दिले आहेत.
लॉकडाऊन संदर्भात मुंबईचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री अस्लम शेख म्हणाले, आम्हाला कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे. लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला असं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाची परिस्थिती आजही नियंत्रणात असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. राज्यात खासगी रुग्णालयात वेटिंग लिस्ट आहे. मात्र, सरकारी रुग्णालयामध्ये कोविड सेंटरमध्ये अद्याप बेड आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.
अस्लम शेख पुढे म्हणाले, कोरोनाच्या टास्क फोर्सने राज्यात 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला होता. काही जणांनी एवढ्या दिवसांचा लॉकडाऊन केला तर त्रास होईल असे मत व्यक्त केले आहे. तर काही जणांनी 14 दिवस तर काही जणांनी 8 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांपर्यंत पोहोचले जात आहे. मात्र, काही राज्ये कोरोनाचे रुग्ण लपवत आहेत. त्यांच्याकडे 15 दिवसानंतर बिकट परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही अस्लम शेख यांनी दिला आहे.