नंदूरबार : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पुन्हा लॉकडाउन करणे एक मार्ग आहे. हा पर्याय समोर दिसत आहे’, असे ते म्हणाले.
नंदुरबार येथे असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘कोरोना व्हायरसचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाने जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आता आहोत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन करणं हा एक मार्ग आहे. लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र, मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरु लागले आहेत’. तसेच परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. मात्र, आता जो पसरतो तो नवा विषाणू आहे का याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. त्यामुळे राज्यातील ही परिस्थिती पाहता ठाकरे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच काल (गुरुवार) एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. तब्बल 25 हजार 833 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर यामध्ये 58 जणांचा मृत्यू झाला. आता ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.