नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे़ येत्या ३१ मेला तो संपणार आहे़ त्यानंतर लॉकडाऊन वाढवायचा की नाही, यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. कोणत्या क्षेत्रात सूट दिली जाऊ शकते, याबाबत मुख्यमंत्र्याचे मत यावेळी शहा यांनी विचारात घेतले.
देशात १७ मेपासून लॉकडाऊन ४ ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. शहा यांच्या अगोदर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यात लॉकडाऊन ५ मध्ये काही विशेष सवलती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या ३१ मे रोजी महिन्यांच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमात मोदी लॉकडाऊन वाढविण्याबाबत घोषणा करतील. आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविला जाऊ शकतो, अशी सुत्रांची माहिती आहे.
देशातील ११ शहरांमध्ये प्रामुख्याने कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे. या ११ शहरांमध्ये अधिक कडक निर्बंध असतील. नव्या लॉकडाऊनमध्ये सरकार जनजीवन आणि अर्थव्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे रेड झोनमध्येही काही सुट देण्यात येणार आहे. लॉकडाऊन ५ मध्ये जीम आणि मंदिरांना सुट दिली जाऊ शकते. मात्र, तेथे सोशल डिस्टन्सिंगचे कठोर पालन करण्याचे बंधन घालण्याची शक्यता आहे. मॉल्स, शाळा, कॉलेजेस यांना परवानगी देण्यात येणार नाही.