पुणे : बहुजननामा ऑनलाइन – निवडणुकीनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे आम्हाला व्हायचे नाही, आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हाच असून तो मान्य करुन घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आघाडीबाबत आरएसएसच्या मुद्द्यावर प्रतीक्षा करू असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
आगामी निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी व्हावी यासाठी काल ( २९ जानेवारी ) प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकी दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ४८ पैकी १२ जागांची मागणी केली. विशेष म्हणजे या मागणी मध्ये सोलापूर लोकसभेची जागाही त्यांनी मागितली आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागणीला काँग्रेसने आक्षेप घेत नकार दिला होता. इतकेच नव्हे तर, सोलापूर लोकसभेची जागा देण्यास काँग्रेसचा विरोधही करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनीच आता निरोप द्यावा, अशी भूमिका देखील काँग्रेसने जाहीर केली होती.
दरम्यान मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ६ जागा देण्यास तयार असल्याचे समोर आले होते. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत १२ जागांसाठी आग्रह धरला आहे. इतकेच नव्हे तर, काल झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना आम्ही १२ जागांच्या मागणीवर ठाम आहोत. त्यापेक्षा कमी जागा आम्ही घेणार नाही. एमआयएमशी युतीबाबत कारण नाही. कारण एमआयएम आता जागा लढणार नाही. असे त्यांनी म्हंटले होते.
मात्र, निवडणुकीनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे आम्हाला व्हायचे नाही. आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हाच असून तो मान्य करुन घेण्याची हीच योग्य वेळ आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, काँग्रेसशी आघाडीबाबत आरएसएसच्या मुद्द्यावर प्रतीक्षा करू, असे त्यांनी जाहीर केले. याचबरोबर पुण्यात वंचित आघाडीच्या सुकाणू समितीची बैठक सुरू असून या बैठकीत काय निर्णय होतो, तो श्रीरामपूरच्या सभेत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.