नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा सासूची प्रकृती ढासळली तेव्हा एका व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब त्यांना भेटायला पाकिस्तानात गेले. या दरम्यान लॉकडाऊन लागू झाल्याने त्यांच्या व्हिसाचा कालावधी देखील संपला. अशा परिस्थितीत जेव्हा ते परत आले तेव्हा त्या व्यक्तीला आणि त्याच्या तिन्ही मुलांना भारतात येण्याची परवानगी मिळाली पण त्यांच्या पत्नीला सीमेवरुनच परत पाकिस्तानला पाठवण्यात आले. हे प्रकरण राजस्थानच्या जोधपूर शहरातील आहे. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन होण्यापूर्वीच पाकिस्तानात गेलेल्या लिलाारामच्या पत्नीला आता भारतात परत येणं कठीण झालं आहे. लिलारामला 3 मुले देखील आहेत.
20 फेब्रुवारीला लिलारामचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात गेले. लिलाराम यांनी पाकिस्तानी दूतावासाकडून व्हिसा घेतला. त्याच वेळी भारत सरकारच्या ‘नो ऑब्लिगेशन टू रिटर्न टू इंडिया (नोरी)’ प्रमाणपत्रातून त्यांच्या पत्नीला पाकिस्तान भेटीची परवानगी देण्यात आली. त्यांच्या कुटुंबाला 60 दिवसांचा व्हिसा देण्यात आला होता पण तिथे गेल्यानंतर लॉकडाऊनमुळे देशाच्या सीमा सील करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या परस्पर करारानंतर दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना विशेष गाड्यांद्वारे आणण्याचे काम सुरू झाले.
लिलाराम आणि त्यांची पत्नी आणि तिन्ही मुले भारतात परत येत होती, त्यावेळी भारतीय सीमेच्या बॉर्डरवर भारतीय इमीग्रेशन अधिकाऱ्यांनी लिलारामच्या पत्नीला भारतात येण्याची परवानगी दिली नाही. दूतावासाकडून मिळालेल्या यादीमध्ये त्यांचे नाव नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत लिलाराम आणि त्यांची तीन मुले भारतात आली पण त्यांची पत्नी पाकिस्तानमध्येच परतली. आता लिलारामचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होत आहे.
त्यांची तीन निरागस मुले आतुरतेने आईची वाट पाहत आहेत. त्याचवेळी सीमेपलीकडे लिलारामची पत्नी देखील आपल्या मुलांना पाहण्यासाठी आतुर होत आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लिलारामच्या पत्नीला देखील आपल्या मुलांची चिंता वाटत आहे. लिलाराम आणि त्यांच्या तीन मुलांनी भारताचे नागरिकत्व मिळवले आहे परंतु अद्याप त्यांच्या पत्नीला सार्वजनिकरित्या भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. त्यांनीही भारत सरकारकडे विनंती केली आहे की तिला परत आपल्या कुटुंबात येण्यासाठी परवानगी द्यावी.
वास्तविक लिलाराम आणि त्याचे कुटुंब 90 च्या दशकात पाकिस्तानहून भारतात येऊन राहू लागले. 2007 मध्ये लिलारामचे लग्न पाकिस्तानी मुलीशी झाले होते आणि तीसुद्धा येथे येऊन राहू लागली होती. सुमारे सात वर्षांपूर्वी लिलाराम आणि त्यांच्या तीन मुलांना भारताचे नागरिकत्व मिळाले पण पत्नीला नागरिकत्व मिळणे अजून बाकी आहे. जेव्हा लिलारामची सासू आजारी पडली तेव्हा संपूर्ण कुटुंब त्यांना पाहण्यासाठी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानला गेले होते परंतु परत येताना लॉकडाऊन सुरु झाले आणि त्यानंतर नोरी (NORI) व्हिसाचा कालावधीही संपला. अशा परिस्थितीत लिलारामच्या पत्नीला सीमेवरुन परत पाठवण्यात आले.