कोल्हापूर (बहुजननामा ऑनलाइन) – ईडी व आयकर हे दोन्ही विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, भाजपमध्ये जे कार्यकर्ते येत नाहीत, त्यांना ईडी व आयकर विभागाच्या माध्यमातून त्रास दिला जातो. असा गंभीर आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी केला आहे. आयकर विभागाने हसन मुश्रीफ यांच्यावर टाकण्यात आलेल्या छाप्याच्या पार्श्वभुमीवर शेट्टी बोलत होते.
शेट्टी म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीम यांच्यावर टाकण्यात आलेले छापे हे केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने टाकण्यात आले आहे. मुश्रीफ यांनी भाजपमध्ये येण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. मुश्रीफ हे मंत्री असताना छापे का टाकले नाहीत असा सवाल देखील त्यांनी भाजप सरकराला विचारला आहे.
कृषीमुल्य आयोगाच्या भुमिकेवर देखील शेट्टी यांनी टिका केली ते म्हणाले, रासायनिक खते, मजूर आणि इंधन खर्चात वाढ झालेली असताना कृषीमूल आयोग तडजोड करुन एकप्रकारे सरकारची सोय करत आहे. राज्य कृषीमूल्य आयोगाचा अध्यक्ष शेतकरी नेता झाल्यानंतर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती. पण पाशा पटेल यांनी केंद्रीय आयोगाला शिफारस करताना उसाचा उत्पादन खर्च ३३२ रुपयांनी कमी झाल्याचा जावई शोध लावला आहे.