बहुजननामा ऑनलाईन – शुक्रवारी चौथ्या दिवशीही पंचगंगा, कोयना, कृष्णेसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या पुरामुळे कोल्हापूर, सांगली, कराड सह पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती कायम आहे. सांगली शहरात आज सकाळ पासून संतधार पाऊस सुरु असून पुणे बंगलुरू महामार्ग आजही बंद आहे. अलमट्टी धरणातून ३ लाख ८२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु असला तरी सांगलीतील कृष्णेच्या पाणी पातळीत ५७.८ फुटापर्यंत वाढ झाली आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मध्यरात्री पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सांगलीत दाखल झाले. सांगली पुरात बुडाली असताना पुण्यात पक्षाच्या कार्यक्रमात मग्न असल्याची टीका झाल्यानंतर सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हेही आज शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सांगलीत पोहचणार आहेत. एकीकडे कृष्णेच्या पाणीपातळीत घट होत नसतानाच सांगली शहरात सकाळ पासूनच संततधार पाऊस सुरु झाल्याने सांगलीकर पुन्हा धास्तावले आहेत.
सांगली शहरात जीवनावशक्य वस्तूंची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. राधनगरीतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत २ फुटाने घटली आहे. तरीही शहरातील पाणी फारसे कमी झालेले नाही. त्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने लोकांच्या मनात अधिकच भीती वाढली आहे. तर कोल्हापुरातील चिखली भागात अजूनही अनेक नागरिक आपल्या घरात अडकले आहेत. या लोकांना जवानांकडून बाहेर काढण्याबरोबरच त्यांना जेवणांचे वाटपही केले जात आहे.
या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्यू मुखी झाली असून पूर ओसरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्याचे मोठे काम प्रशासनासमोर असणार आहे. तर काही ठिकाणी अनेक जनावरे अडकून पडलेली दिसत आहेत. दुसरीकडे कोल्हापूर शहरातील पाणी कधी ओसरेल हे कोणीही सांगू शकत नसल्याने सुरक्षितस्थळी असलेल्या लोकांना आपल्या घराची चिंता आता सतावू लागली आहे.