नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळालेल्या आम आदमी पक्षाचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे निश्चित आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक करणार आहेत. या निकालानंतर भाजपवर सर्व स्तरावरून टीका होताना दिसत आहे. दिल्लीतील जनतेनं आपल्या मुलाला निवडून दिलं आहे. दिल्लीकरांची सेवा केल्यामुळेच हा विजय मिळाला आहे. भाजपाने, सत्ता, पैसा आणि दिग्गज मंत्र्यांची फौज दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारात उतरवली होती. मात्र, दिल्लीकरांनी ‘आप’ला माणूस निवडून दिला, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी म्हटलंय.
दिल्ली विधानसभेत आपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिंह यांनी हा विजय जनतेचा असल्याचं म्हटलं. तसेच, दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिलंय की, त्यांचा मुलगा देशद्रोही नसून कट्टर देशभक्त आहे. दिल्लीकरांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल त्यांचे आभार, असेही संजय सिंह यांनी म्हटले आहे. मोदींनी आपल्या भाषणाता नाव न घेता केजरीवाल यांना देशद्रोही असे म्हटले होते. त्यास, सिंह यांनी निकालानंतर उत्तर दिलंय.
दरम्यान, मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेला देशद्रोहाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दिल्लीतील जनतेने दाखवून दिले आहे. मोदींचा सल्ला ऐकून दिल्लीतील जनतेनं मतदान प्रक्रियेतून भाजपाला देशद्रोही घोषित केल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्याने दिल्लीत त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्षे कामं केल्यामुळेच आपचा विजय निश्चित असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. ‘दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या पाच वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत’ असं त्यांनी म्हटलं आहे.