बहुजननामा ऑनलाइन टीम – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी (Karnataka Chief Minister Yeddyurappa )जाहीर नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने वाद निर्माण करणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहताना केलेल्या वक्तव्यावरुन सीमावाद चांगलाच पेटला आहे. अजित पवार यांनी बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया असं म्हटलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हटले…
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला.
यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची प्रतिक्रिया
मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. महाजन आयोगाचे निर्णय़ अंतिम आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे. अशा प्रकारे वाद निर्माण करणं चुकीचं आहे. बेळगाव कर्नाटकचा भाग असल्याचं सांगणाऱ्या महाजन रिपोर्टवर आमचा विश्वास आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध आहे. आम्ही यासंबंधी पत्र लिहू.