मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील तापमानाचा पारा घसरला असून गारठा वाढला आहे. मराठवाडा,विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशाखाली नोंदविण्यात आले असून सर्वाधिक कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातदेखील बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव जाणवत असला, तरी दिवसाच्या तापमानात घसरण झालेली नाही. कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, रात्रीचे किमान तापमान मात्र २० अंशाखाली येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, उत्तरोत्तर यात आणखी घसरण होईल आणि थंडीचा प्रभाव आणखी जाणवेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्याचा विचार केल्यास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक थंडी जाणवत असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे वाहू लागल्यानंतर यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
कुलाबा २२.५, पुणे ११.३, औरंगाबाद १२.५, महाबळेश्वर १३.६, नाशिक ११.८, जळगाव १२, कोल्हापूर १६, सातारा १२.८, सोलापूर १३, चंद्रपूर ८.६, परभणी १०.१, यवतमाळ ९.५, गोंदिया १०.५, नागपूर ११.५.