लखनऊ : वृत्तसंस्था – हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्ये प्रकरणी त्यांच्या आई कुसुम तिवारी यांनी नवे विधान केले असून भाजपचे नेते शिवकुमार गुप्ताच आपल्या मुलाच्या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या चौकशीवरही त्यांनी अविश्वास दाखवला आहे.
पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधताना कुसुम यांनी सांगितले कि , स्थानिक मंदिराच्या बांधकामाच्या मुद्द्यावरूनच माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे, पोलिसांनी शिवकुमार गुप्ता त्यांच्या थातेरी येथील निवासस्थानी जाऊन तपास घ्यावा. तसेच माझ्या मुलाच्या हत्येला योगी आदित्यनाथ सरकारच जबाबदार आहे. असे सांगत त्या म्हणाल्या कि, अखिलेश यादव सरकारच्या काळात माझ्या मुलाच्या सुरक्षेसाठी १७ पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र योगी सरकारच्या काळात फक्त ४ पोलीस देण्यात आले होते. दोन पोलीस कमलेश यांच्यासोबत असायचे तर इतर दोन पोलीस त्यांच्या कार्यालयात थांबायचे. ज्या दिवशी तिवारी यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांच्यासोबत एकही पोलीस नव्हता, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था जर नीट असती तर माझा मुलगा वाचला असता, असे आरोप कुसुम यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर आरोप केले आहेत.
त्याचबरोबर कमलेश यांची पत्नी आणि मुलीला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत पोलिसांनी घटनेच्या दिवशी रात्री २ वाजेपर्यंत कमलेश यांचा मृतदेह हवाली केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलीस मृतदेह सीतापूरला घेऊन जायला सांगत होते. त्याला आम्ही नकार दिल्यांतर पोलिसांनी आमच्यावर लाठीमारही केला. त्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत, असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आश्वासन देऊनही कमलेश यांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत. त्यामुळे आता आम्ही त्यांना भेटायला का जावं ? ते नाही भेटले तरी चालतील, पण आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
Visit : bahujannama.com