बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार आला आहे. राज्यात(Gram Panchayat election) ग्राम पंचायतनिवडणूक होत आहे. यामध्ये समोरच्या पॅनलचा काटा काढण्यासाठी स्मशानात उमेदवारांची नावे असलेला कागद कणकेच्या गोळ्यात खोचलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याण ग्रामीणमधील आणे भिसोळ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. याच गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. वाघेरापाडा स्मशानभूमीत निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची नावे हाताने लिहलेला कागद सापडला आहे. हा कागद कणकेच्या गोळ्यामध्ये खोवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच येथील प्रचार संपला आहे. या पार्श्वभूमीवर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघेरा पाडातील एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत आले असताना हा प्रकार त्यांना दिसून आला. एका चितेशेजारी कणकेचा गोळा ठेवला होता. ग्रामस्थांनी हा कागद उचलून पाहिला तेव्हा त्यावर उमेदवारांची नावे दिसली. यामुळे खळबळ उडाली होती.