मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाला आरक्षण दिलं, सरकारचे अभिनंदन, याचे सेलिब्रेशनही झाले. परंतु याच आरक्षणाच्या लढाईत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि एसटी महामंडळात नोकरी दिली जाईल असे सरकारने आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. असा सवाल विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून देण्यात आलेले आरक्षण ग्राह्य धरले असून अपवादात्मक स्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. या निर्णयाचे विधीमंडळात स्वागत करण्यात आले. सरकारचे अभिनंदनही करण्यात आले. मात्र आरक्षण मिळाले असले तरी या आरक्षणाच्या लढाईत ज्या आंदोलकांचं बलिदान गेलं त्यांना पैसे आणि नोकरी देण्याच्या आश्वासनाचं काय झालं?
काय म्हणाले वडेट्टीवार ?
मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबद्दल सरकारचं अभिनंदन. पण या आरक्षणाच्या लढाईत जवळपास १३ हजार ७०० तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही. मराठा समाजातील आंदोलकांवर ३०७, २९४, ५२४ कलमान्वये गुन्हे धाखल आहेत. हे गुन्हे कधी माफ होणार? कारण आंदोलक युवक हे महाविद्यालयातील विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. याबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. तसेच आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये आणि कुटुंबातील एकाला नोकरी कधी मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी दिले.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्ह्यांचे पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांची एक समिती असते. ती समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करते. त्यानंतर समितीच्या अहवालानुसार न्यायालय ही प्रक्रिया पुर्ण करते. त्यामुळे ती कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले. तर मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना नोकरी आणि १० लाख रुपयांची मदत देण्यासंदर्भात माहिती घेऊन सोमवारी सविस्तर चर्चा करू असे ते म्हणाले.