जीप नदी कोसळून सहा जण ठार, सात जखमी

भंडारा : अवैध प्रवासी वाहतूक करणारी भरधाव जीप (काळी पिवळी) पुलावरुन नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार तर ७ जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये चार विद्यार्थीनी असून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बीएससीच्या प्रवेशासाठी त्या साकोली येथे आल्या होत्या. हा अपघात साकोली ते लाखांदूर मार्गावरील कुंभली गावाजवळील चुलबंद नदीवर मंगळवारी दुपारी घडला. मृतामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.
शीतल सुरेश राऊत (वय १२), अश्विनी सुरेश राऊत (वय २२, दोघीही रा़ सानगडी), शिल्पा श्रीरंग कावळे (वय २०),शारदा गजानन गोटफोडे (वय ४५, दोघेही रा़ सासरा), सुरेखा देवाजी कुंभरे (वय २०, रा.सासरा टोली) आणि गुनगुन हितेश पालांदुरकर (वय १५, रा.गोंदिया) अशी मृतांची नावे आहेत. तर वंदना अभिमन सतीमेश्राम (वय ५०), डिंपल श्रीरंग कावळे (वय १८), अभिमन तातोबा सतीमेश्राम (वय ४५, तिघेही रा़ सासरा), शुभम नंदलाल पातोळे (वय २०, रा. तई), विणा हितेश पालांदूरकर (वय ३०), सिद्धी हितेश पालांदुरकर (वय ५, दोघेही रा़ गोंदिया) आणि मालन तुळशीराम टेंभुर्णे (वय ६५, रा़ खोलमारा जैतपूर) अशी जखमींची नावे आहेत.
साकोली येथून प्रवासी घेऊन काळीपिवळी जीप लाखांदुरकडे मंगळवारी दुपारी जात होती. कुंभली येथील चुलबंद नदीपुलावर समोरुन आलेल्या वाहनाने काळीपिवळी जीपला डॅश दिला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप थेट ४० फुट खोल चुलबंद नदीच्या पात्रात कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, जीपचा अक्षरश: चुराडा झाला होता.अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच साकोलीचे ठाणेदार बंडोपंत बनसोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.जखमींना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या जीपमधून सासरा आणि सानगडी येथील बहुतांश प्रवाशी प्रवास करीत होते.सासरा व सानगडी येथील बारावीत उत्तीर्ण विद्यार्थिनी साकोली येथे बीएससीच्या प्रवेशासाठी आल्या होत्या. गावी परत जाण्यासाठी या जीपमधून त्या प्रवास करीत होत्या.अपघाताचे वृत्त सानगडी आणि सासरा येथे कळताच गावकऱ्यांनी साकोली येथील रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती.घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
Comments are closed.