बहुजननामा ऑनलाइन टीम : भाजपातील जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षातील नेत्यांनाच पुन्हा खडसावले आहे. भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना आहे. निवडणुकीत तिकीटे दिले नाही, त्यामागे राजकारण होते. रोहिनी खडसे तिकीट मागत नव्हत्या, तरीही दिले. अपमानास्पद वागून दिली जाते. हा विश्वासघात आहे. आधी असे राजकारणात होत नव्हते. गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आली नसती, अशी खंत व्यक्त करत एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला.
लोकनेते गोपीनाथ यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी खंत व्यक्त केली. याचबरोबर, गोपीनाथ मुंडे असताना आम्ही हसत-खेळत राजकारण केले. त्यांच्या संघर्षामुळे भाजपाला सध्या चांगले दिवस आले. गोपीनाथ मुंडे कार्यकर्त्यांचे आधार होते. ते पाठीत खंजीर खुपसणारे नव्हते. पंकजा, रोहिणीच्या पराभवामागे षडयंत्र होते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
याआधीही ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचे एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वाकडे सांगत नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ खडसे दिल्लीमध्ये गेले असता भाजपाच्या वरिष्ठांनी भेट न दिल्याने ते थेट शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत तर जाणार नाही ना अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली होती. याशिवाय, पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी विधान भवनात दाखल झाले. शरद पवार, पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने एकनाथ खडसेंच्या मनात नेमके काय सुरु आहे, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. तसेच, पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीतही पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे गैरहजर राहिले होते. त्यामुळे आजच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Visit : bahujannama.com