मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – जनता भाजप नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजप नेत्यांना सहन होत नाही. भाजपने रडीचा डाव खेळू नये, अशा शब्दात मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना उत्तर दिले आहे. भाजप नेत्यांवर ट्रोलिंग होते म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी काल पोलिसांत तक्रार केली आहे. यावरून जयंत पाटलांनी सोशल मीडियातील टीका थांबविणे ही जीवनावश्यक सेवा आहे का ? असा सवाल केला आहे.
भाजप नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापुर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजप नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्यावरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहे. यातून भाजप नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
गेली पाच वर्षे आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती. त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजप नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजप नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये, असंही पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एनपी न्यूज24 नेटवर्क