कोल्हापूर :बहुजननामा ऑनलाइन- पाकिस्तानने (Pakistan) जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सीमा भागात केलेल्या गोळीबारात शुक्रवारी महाराष्ट्रातील दोन जवान शहीद (jawans martyred) झाले. ऐऩ दिवाळीत दोन जवानांना वीरमरण आल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
यात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना वीरमरण आले आहे. अंत्यसंस्कारांसाठी या दोन्ही जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले आहे. सोमवारी एकीकडे भाऊबीजेचा दिवस सुरू झालेला असतानाच दुसरीकडे मात्र जोंधळे कुटुंबावर भलतीच शोककळा पसरली. बहीण- भावाच्या नात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा भाऊबीजेच्या याच दिवशी जोंधळे यांच्या बहिणीच्या नशिबी मात्र नियतीने हा दिवस लिहिला होता.
दु:ख शब्दांतही मांडता येणार नाही हा तो क्षण, जेव्हा भाऊबीजेसाठी अनेकांच्या भावाचे बहिणीकडे येणे अपेक्षित असते. जोंधळे यांच्या धाकट्या बहिणीचीही हीच अपेक्षा होती. पण, तिला मात्र या दिवशी शहीद भावाचे पार्थिव पाहवे लागले. अवघ्या विसाव्या वर्षी या तरुणाने भारत मातेसाठी आपला देह ठेवला. कोल्हापूरचे जवान ऋषिकेश जोंधळे आणि काटोलचे रहिवासी भूषण सतई हे पूंछ जिल्ह्यातल्या सावजीयानमध्ये तैनात होते. पाकिस्तानच्या गोळीबारात जोंधळे जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारांसाठी सैनिकी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असतानाच त्यांना हौतात्म्य आले आहे. जोंधळे यांच्या मागे त्यांचे आई वडील आणि धाकटी बहीण असा परिवार आहे.