हैद्राबाद : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी काल महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली आहे. ज्या गरीब आणि गरजू महिला आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री रेड्डी यांनी ‘अम्मा वोडी’ ही योजना आणली आहे. मुलांना शाळेतील शिक्षणात मदत व्हावी, म्हणून प्रत्येक आईच्या खात्यात १५ हजार रु. दर वर्षाला जमा होणार आहेत. राज्यातल्या ८२ लाख मुलांना या योजनेचा लाभ होणार असून ४३ लाख मातांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेची माहिती जगन मोहन रेड्डी यांनी तिरुपतीपासून ७० किलोमीटरवर असलेल्या चित्तूरमध्ये एका जनसभेदरम्यान दिली असून लॅपटॉपचे बटन दाबून त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला. तसेच योजनेमध्ये ६,३१८ कोटी रुपये खर्च होतील, असे त्यांनी सांगितले.
‘शासकीय शिक्षण संस्थांमधील सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी १४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ४५ हजार सरकारी शाळा, बारावीपर्यंतचे शिक्षण देणारी ४७१ महाविद्यालये, पदवीपर्यंतचे शिक्षण १४८ महाविद्यालये आणि वसतिगृहांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्याचे काम याद्वारे केले जाईल,’ अशी माहितीही त्यांनी त्यावेळी दिली.
जगन मोहन रेड्डी यांनी २०१७-१८ मध्ये काढलेल्या पदयात्रेदरम्यान त्यांना कल्पना सुचल्याचे रेड्डी यांनी सांगितले. ‘घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं अनेक महिला त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नसल्याचं पदयात्रेदरम्यान मला जाणवलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मुलांच्या शिक्षणाआड येऊ नये असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला. त्यातून त्यांना अम्मा वोडी योजनेची कल्पना सुचली,’ असे रेड्डी यांनी सांगितले. तसेच शाळा, महाविद्यालयातून अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि आयकर भरणाऱ्या नागरिकांना यातून वगळले आहे.
Visit : bahujannama.com