मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील ४१७ आयटीआय मधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या चॉईसनुसार बदली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या कौशल्य विकास विभागाने घेतला आहे याची माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल्य व विकास विभागाच्या अंतर्गत राज्यातील ४१७ आयटीआय येतात. यात सहा हजार कर्मचारी व शिक्षक आहेत.
या खात्याच्या मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी आमदार-खासदार व राजकीय लोकांची दररोज अनेक शिफारसपत्रे येतात. या कर्मचाऱ्यांना घरगुती तर कधी वैयक्तिक कारणांमुळे जिल्हा किंवा घराच्या जवळ बदल्या हव्या असतात. त्यामुळे आता आयटीआयमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार बदली देण्यात येईल. त्यासाठी त्यांच्याकडून बदलीचे दहा पर्याय मागवण्यात येतील.
या प्रणालीच्या माध्यमातून २०२०-२१ पासून सर्व प्रकारच्या बदल्या फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जाणार आहेत. राज्यात ग्रामविकास विभागानंतर ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवणारा कौशल्य विकास विभाग आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. सध्या बदल्यांसाठी सुमारे ७०० अर्ज आले असून या बदल्या ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील. कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी https://hrms.dvet.gov.in/ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.