मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केली आहे. मात्र ही याचिका दाखल करून घेण्यायोग्य आहे की नाही, यावर उच्च न्यायालय सोमवारी (दि. 5) निकाल देणार आहे. याचिका दाखल करून घेतली तरच पुढे सुनावणी होणार आहे.
गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टींगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होतो, असे सिंग यांनी दाखल केले्ल्या याचिकेत म्हटले आहे. न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर 31 मार्चला सुनावणी होती. तब्बल 6 तास सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, याचा निकाल राखून ठेवला आहे. आता 5 एप्रिल रोजी यावर निर्णय होणार आहे. सरकारी वकिलांनी ही याचिका दाखल करून घेण्यावर आक्षेप घेतला. सिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांना आयुक्तपदावरून गृहरक्षक दलाची जबाबदारी दिल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे म्हटले आहे. तसेच त्याशिवाय दाखल केलेल्या अन् 3 याचिकांवर 5 एप्रिल रोजी निकाल देण्यात येणार आहे.