मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आहेत. त्यांना चौकशीस हजर राहण्याचे समन्स मुंबई पोलिसांनी पाठवले होते. मात्र, त्यांनी दोन्ही वेळा असमर्थता दर्शवत थेट हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप करत त्यांनी चौकशीस बोलावण्याबाबत दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका याचिका शुक्रवारी (दि २९ एप्रिल) दाखल केली आहे. आता या याचिकेवर ६ मे ला हैद्राबाद हायकोर्टात सुनवाणी होणार आहे. दरम्यान, या याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि SP सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी २८ एप्रिलला हजर राहण्याचे समन्स रश्मी शुक्ला यांना पाठवण्यात आले होते. मात्र सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं शुक्ला यांनी कळवलं आहे. कोरोनाचे कारण देत त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाच्या परिस्थितीमुळे रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नाही. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं. रश्मी शुक्ला या फेब्रुवारीपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु आहे, नुकताच सीबीआयने हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात शुक्ला यांना साक्षीदार करणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याला अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकलेला नाही.