मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलट्या आणि पोटात दुखण्यासारखे त्रास होत असल्याचा प्रकार समोर आला होता. काही कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले असल्याची माहितीही समोर आली होती.हा त्रास दुषित पाण्यामुळे होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येते आहे.
कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या पाश्वभुमीवर मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, तसेच पाण्याची टाकी, मंत्रालयात बसवलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत.
सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी हे निर्देश दिले.
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सफाई झाली असली तरी कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे निर्देश मेहता यांनी दिले. तसेच त्यांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतली.
दरम्यान, राज्याच्या अनेक भागांमधून नागरिक कामानिमित्त मंत्रालयात येत असताता. अशा परिस्थितीतही पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.