मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘इंदिरा गांधी यांच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटत, त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्वाची काळजी वाटावी हे आश्चर्य आहे. भाजपमध्ये घुसलेल्या इरसाल बाटग्यांची हि उठाठेव आहे,’ अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली आहे. इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने सेनेला बरेच काही ऐकवले. तसेच काँग्रेसने या वक्तव्याची गंभीर दखल घ्यावी, असे भाजप नेत्यांनी सुचवले होते. इंदिरा गांधी यांच्याबद्दल भाजप आपुलकी दाखवत असल्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याने ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपवर टीका करत आजचा लेख लिहिण्यात आला आहे.
अग्रलेखातील काही मुद्दे-
भाजपला सध्या काही काम नसल्यानं ते अनेक विषयांचं उत्खनन करू लागले आहेत. भाजपमध्ये घुसलेल्या काही इरसाल बाटग्यांनी हे प्रकार सुरू केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही.
सत्ता हातून सटकल्यानं निद्रानाशाचा रोग जडला हे समजू शकतो, पण त्यामुळं जे झटके येत आहेत त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत.
इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व महान होते. त्यास तडे देण्याचे प्रकार मधल्या काळात सरकारकडून झाले. आज भाजपला वाटते इंदिराजींचा अपमान झाला. त्यांना असं ‘वाटणं’ हाच इंदिराजींचा सन्मान आहे.
इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झाला नसेल, पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते असं काहीसं सुरू आहे.
मुसाफिरखान्यातील कार्यालयात करीम लालाचे जगभरातील नेत्यांसोबतचे फोटो होते. आज ते कार्यालय व दिवाणखाना नाही. त्यातील तसबिरी आजच्या भाजपवाल्यांनी पाहिल्या असत्या तर त्यांच्या डोळ्यांची बुबुळेच बाहेर पडली असती.