मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणातून नवीन भूमिकेचे संकेत देत राज्य ६० व्या वर्षात तर मी ८० व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे म्हटले आहे. पुढे त्यांनी आता या वयात थांबायचे. आता कसलं व्हिजन बघत बसायचं. व्हिजन बघण्यासंबधीचे काम नव्या पिढीकडे द्यायचं आणि आपण बघत राहायचं त्यांच्याकडे.अलीकडे मी तेच काम करत असून त्याच्याकडे मी बघत बसतो, काही अडचण आली, विचारलं तर सांगायचं, असे ते म्हणाले आहेत.
तसेच त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान सक्रीय निवडणुका आता लढणार नाही, असे विधान केले असताना आता पुन्हा एकदा आपल्या बदलत्या भूमिकेचे संकेत दिले आहे. आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात हे बघत बसायचं, असही ते म्हणाले आहेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. त्यांनी पुढे म्हटले की, कारण नसताना सल्ला देणे आणि सतत कामात हस्तक्षेप करणे योग्य नसून त्यामुळे तुमचा मान राहत नाही.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षं टिकेल. काँग्रेसमध्ये निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागत, असे ते म्हणाले. शिवसेनेचे निर्णय मुंबईतच होत असून आज काँग्रेसने निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. सहकार्य करायचे आणि सरकार टिकवायचे ही भूमिका काँग्रेसमध्ये दिसते. शिवसेना म्हणून आमचा शिवसेनेशी कधी संपर्क आला नाही. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे मित्र असल्यामुळे त्यांच्याशी खूप संपर्क होता. त्यांनी एखादा शब्द दिला तर तो पूर्ण करायचे, असेही ते म्हणाले. तसेच सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार असून मला स्वतःला या सरकारबद्दल कुठलीही शंका नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते सर्वांना सोबत घेऊन चालणार आहेत, दुसऱ्यांच्या कामात ते अजिबात हस्तक्षेप करत नाहीत, असे ते म्हणाले.